शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला यश : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार

नव्या मतदारांना मतदान आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई (१९ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस आणि मतदानास इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीला यश मिळाले असून राज्य निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर तात्पूरती स्थगित केलेली सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे.

भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की,महानगर पालिका, नवी मुंबई, औरंगाबाद व वसई विरार , ९ नगर परिषद – नगर पंचायती व पोटनिवडणुका, जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या ( भंडारा व गोंदिया ) आणि १५७० ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम व सुमारे १२०१५ ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना कार्यक्रम सुरू होता. मात्र कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगर पालिका, नगर परिषदा – नगर पंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रास्तावित असणाऱ्या निवडणूका १७ मार्च रोजीच्या आदेशानुसार आहे त्या टप्प्यावर स्थगित करुन ३ महिण्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या व पुढिल ३ महिने कोणत्याही निवडणूका न घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

सदर प्रकरणी आजरोजी ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटून गेलेला आहे.उमेदवारी दाखल केलेल्या अनेकांना कोविड १९ मुळे निवडणूक प्रक्रियेस विलंब झाल्याने ते चिंताग्रस्त आहेत तसेच कित्येक नवमतदार वयोमर्यादेने उमेवारीस आणि मतदानास पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात येण्याची गरज असल्याचेही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

दरम्यान राज्यभरातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२०या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *