विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा साक्षीदार हरपला

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर (३० जुलै) : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, कष्टकरी – शेतकरी – कामगार – दलित – श्रमिक – बहुजन समाजाचा महाराष्ट्र राज्य विधानसभेतील बुलंद आवाज, जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात आणि रस्त्यावरील आंदोलनात धडाडणारी तोफ,सत्ताधाऱ्यांना जनहिताचे कायदे करण्यास बाध्य करणारे मुरब्बी राजकारणी, ११ वेळा विधानसभेवर निवडून येऊन आमदारकीचा विश्वविक्रम करणारे,महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री ॲड. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले.

सोलापूर येथील अश्विनी या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बीपी नॉर्मल झाली होती.,ते आवश्यक लिक्वीड डाएटही घेत होते. मात्र आज रात्री ९.०० वाजता दरम्यान अखेर निधन झाले.

भाई गणपतराव देशमुखांनी वयाची ९६ वर्षे पूर्ण केली होती. या वयातही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते. जनसामान्यांचे प्रश्‍न तडीस लावून नेत होते. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर अश्विनी हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या पित्ताशयातील खड्यांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली होती.

आमदार गणपतराव देशमुख हे सलग ५४ वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

रोजगार हमी मंत्री असताना भाई गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबासारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग होता.

भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कामकाजाच्या ५४ वर्षांच्या अनुभवाला संपूर्ण महाराष्ट्राने गमावले आहे.

शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *