शेकापक्षाचा ७३ वा वर्धापन दिन गावागावात साधेपणाने होणार साजरा

शेकापक्षाचा ७३ व्या वर्धापन दिनी
सरचिटणीस आ. भाई जयंत पाटील फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

            शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी २ ऑगस्ट रोजी दिमाखदारपणे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी येणारा शेकापक्षाचा 73 वा वर्धापनदिन यावर्षी कोरोना आणि निसर्गचक्रीवादळाचे संकट असल्यामुळे सामाजिक भान राखून दरवर्षीच्या परंपरेनुसार करण्याऐवजी सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक गावात नियमांचे पालन करुनच साजरा करण्याचा निर्णय शेकापक्षाने घेतला आहे. यादिवशी शेकाप कार्यालयात, तसेच गावागावात आणि तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या सर्व निमयांचे पालन करुनच सकाळी ११ वाजता ध्वजारोहन करण्यात येणार असल्याची माहीती शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड राजेंद्र कोरडे यांनी दिली.
            शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे डाव्या विचारांच्या पुरोगामी कार्यकर्त्यांचा उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी रायगड जिल्ह्यात मोठा उत्साह पहायला मिळतो. मोठया प्रमाणावर साजरा केल्या जाणार्‍या वर्धापनदिनी अनेक डावे विचारांचे विचारवंत नेेते एकत्र येत. एक वेगळा विचारा महाराष्ट्राला देत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या वर्धापनदिनाकडे लागलेले असते. शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केल्या जाणार्‍या या वर्धापन दिनी शेकापक्षाचे राज्यातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यांबरोबरच महाराष्ट्रातील डाव्या विचारांचे कार्यकर्ते देखील हजेरी लावत असतात.
            मात्र २०२० सालावर कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरात आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे यावर्षी शेकापक्षाचा ७३ वा वर्धापन साजरा करताना तो मोठया प्रमाणावर भव्य दिव्य स्वरुपात साजरा न करता रविवार दि. २ ऑगस्ट रोजी साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाच्या तालुका चिटणीसांनी वर्धापनदिन आपापल्या तालुक्यात पक्ष कार्यालया शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन सकाळी ११ वाजता प्राथमिक स्वरुपात ध्वजवंदन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामपंचायती स्तरावर शासनाचे सर्व नियम पाळून झेंडा वंदन करण्याचे आवाहन कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड राजेंद्र कोरडे यांनी केले आहे. तसेच २ऑगस्ट रोजी शेकापचे राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील  कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या  माध्यमातून संवाद साधणार आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *