आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : अखेर विद्यार्थी, शिक्षकांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

मुंबई (७ नोव्हेंबर) : कोरोना संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर सलग सात महिन्यांपासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत, शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम मिळावा यासाठी दिवाळीची सुट्टी पुर्वीप्रमाणेच जाहीर करण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालेले असून शासनाला १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करावी लागली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन अध्ययन अध्यापन आणि शालेय कामकाज प्रक्रियेत व्यस्त आहेत. विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभागी होऊन ३-४ तास शिक्षण घेत आहेत. प्रत्येक दिवशी २-३ तास ऑनलाईन लेक्चर, कोरोना प्रतिबंधक ड्युटी, धान्य वाटप, शालेय कामकाज, ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संपर्क करून शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेणे अश्या अनेक प्रकारची कामे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत.

असे असतांनाही दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार शासनाने दिनांक १२ नोव्हेंबर ते दिनांक १६ नोव्हेंबर या फक्त ५ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केलेली आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या या ७६ दिवस आहेत. या ७६ दिवसांमध्ये दिवाळीची सुट्टी ही १८ दिवसांची असते. परंतु यावर्षी शासनाने १८ दिवसांऐवजी फक्त ५ दिवसच दिवाळीची सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील ७ महिन्यापासून अध्ययन – अध्यापन – शालेय कामकाजात गुंतलेले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर यांना १८ दिवसांची दिवाळी सुट्टी नाकारून फक्त ५ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करणे अन्यायकारक आहे, अशी टीकाही आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली होती.

कोरोना संक्रमण काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय कामकाजात एकूण योगदान पाहता विशेष बाबत म्हणून फक्त यावर्षी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांप्रमाणेच १८ दिवसांची सुट्टी मिळणे आवश्यक आहे, याबाबतही आपण विचार करावा. आणि शासनाने दिनांक ०५ सप्टेंबरच्या शासन निर्णयात सुधारणा करावी. व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १८ दिवसांची सुट्टी तात्काळ जाहीर करावी तसेच इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी नियोजित परीक्षांचे नियोजन हे १८ दिवसांच्या दिवाळी सुट्टी नंतरच करण्यात यावी, अशीही मागणी आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली होती.

सदर मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन काल ६ नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाने नव्याने आदेश काढून ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केलेली आहे.

आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशामुळे विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांचे आभार मानले आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *